Jiva Mahala जीवा महाला
4.5/5
()
About this ebook
शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवा महाला यांच्या जीवनावरील कादंबरी
Kadambari on Life of Jiva Mahala, A life saviour of Shivaji Maharaj
Related to Jiva Mahala जीवा महाला
Related ebooks
Kadve Pravachan Rating: 0 out of 5 stars0 ratingsShree Chhatrapati Shivajee Maharaj Rating: 0 out of 5 stars0 ratingsEk Thor Vijeta : Samrat Ashok Rating: 2 out of 5 stars2/5Mahan Chanakya Rating: 0 out of 5 stars0 ratingsNarveer Tanaji Malusare in Marathi Rating: 0 out of 5 stars0 ratingsआदर्श विवाह विवाह समुपदेशन हस्तपुस्तिका Rating: 4 out of 5 stars4/5Bhagwad Geeta Se Sikhen Safalta ke Sutra Rating: 0 out of 5 stars0 ratingsGharcha Vaidya Rating: 0 out of 5 stars0 ratingsमृत्यूवेळी, आधी आणि नंतर Rating: 0 out of 5 stars0 ratingsमुली तू हे करू शकतेस Rating: 0 out of 5 stars0 ratingsमी कोण आहे Rating: 4 out of 5 stars4/5पैशांचा व्यवहार Rating: 0 out of 5 stars0 ratingsDattaprabhunchya Goshti दत्तप्रभूंच्या गोष्टी Rating: 5 out of 5 stars5/5आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १ Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६ Rating: 0 out of 5 stars0 ratingsया विश्वाचे रहस्य Secret of the Universe Rating: 0 out of 5 stars0 ratingsKrishnakhyan: Mahabharatacha Rahasyabhed, #1 Rating: 0 out of 5 stars0 ratingsअजिंक्य ताराराणी Rating: 0 out of 5 stars0 ratingsBharat Ke Amar Krantikari : Chandrashekhar Azad Rating: 0 out of 5 stars0 ratingsकायापालट Rating: 0 out of 5 stars0 ratingsSagaracha Kinara सागराचा किनारा Rating: 0 out of 5 stars0 ratingsजयवंती ची काव्यधारा: 'जयवंतीची काव्यधारा' Rating: 0 out of 5 stars0 ratingsMaza Barach Kahi माझं बरंच काही Rating: 1 out of 5 stars1/5गौतम बुद्धाचे आर्थिक विचार Rating: 0 out of 5 stars0 ratingsएक विलक्षण उड्डाण Rating: 0 out of 5 stars0 ratings
Related categories
Reviews for Jiva Mahala जीवा महाला
7 ratings0 reviews
Book preview
Jiva Mahala जीवा महाला - Prof. Dr. Suresh Gayakwad
मनोगत
छ. शिवाजी महाराज व अफजलखान भेटी प्रसंगी बडा सय्यद राजांच्यावर वार करण्यासाठी सरसावला त्या प्रसंगी क्षणाचाही विलंब न लावता बडा सय्यदचा उगारलेला हात वरच्यावर कलम करून जिवा महालाने राजांचे रक्षण केले. त्याच्या या कामगिरीमुळे स्वराज्याचा पुढचा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचे समकालीन असणारे कवी परमानंद व शाहीर अज्ञानदास यांनी जिवा महालाच्या या शौर्याचे वर्णन केले आहे. पुढे बखरकारांनीही या प्रसंगाचे यथायोग्य वर्णन केलेले आहे.
‘जिवा महाला’ या माझ्या चरित्रात्मक कादंबरीच्या परिशिष्टामध्ये मी जिवा महालाविषयी असणारी ऐतिहासिक व प्रामाणिक माहिती दिलेली आहे. वाचकांना या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. ऐंशी वर्षांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या दै. ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव यांनी माझी लघुकादंबरी ‘शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जिवा महाला’ ३६ भागांमध्ये क्रमशः प्रकाशित केली. त्याबद्दल त्यांचे, पत्रकार व माझे मित्र अतुल देशपांडे, या कादंबरीवर आपली प्रतिक्रिया नोंदवणारे रसिक अग्रणी अरुण गोडबोले, प्रा. संभाजीराव पाटणे, प्रा. डॉ. रविंद्र चव्हाण, प्राचार्य विलास इनामदार, प्रा. सौ. ज्योती खराडे, कवी वसंत शिंदे, सातारा मराठा विद्या प्रसारक समाजाचे चेअरमन शरदराव चव्हाण, अॅड. गिरीश कुलकर्णी, प्रा. चंद्रकांत गीते, शंकर भाऊ दळवी, लक्ष्मण जाधव, चंद्रकांत हिंगमिरे , प्रा. सुवर्णा कांबळे, कादंबरी आवडल्याचे कळविणारे अनेक वाचक ज्यांच्या नावांची यादी फार मोठी आहे त्या सर्वांचे, कादंबरीला प्रस्तावना लिहिणारे जेष्ठ लेखक विश्वास दांडेकर, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यशवंत पाटणे, माझे मित्र व ग्रंथपाल लालासाहेब पाटील, महाविद्यालयातील माझे सर्व प्राध्यापक मित्र, माझी पत्नी सौ. प्रभावती, चि. डॉ. देवदत्त. स्नुषा डॉ. सौ. सोनल, कन्या प्रा. सौ.ज्योती व जावई प्रो. धनाजी खराडे, माझी नातवंडे तेजस्विनी, अवनीश व आदित्य, सासूबाई-सर्वांच्या आजी तुळसाबाई साळुंखे, प्रकाशक सौ. सुनीता दांडेकर व त्यांचे सहकारी या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
-सुरेश गायकवाड
‘जिवा महाला’ चे स्वागत करू या...
जिवा महाला या नावाची ओळख प्रत्येक मराठी माणसाला शाळकरी वयात होते. छत्रपती शिवाजी हे नाव सर्व मतभेदांपलीकडे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहे. महाराजांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यांत कांही नाट्यमय प्रसंग आहेत. पन्हाळ्याहून निसटणे, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, आग्रा येथून गुप्तपणे सुटका करून घेणे हे काही ठळक प्रसंग. या मोजक्याच नाट्यमय प्रसंगातला पहिला अफजलखान वध आहे. खरे तर एका व्यक्तीने दुसऱ्यास ठार करणे यात नाट्य असेल, आहेच पण त्याला इतके महत्त्व का? याचे उत्तर दुहेरी आहे. घडलेला प्रसंग हा फक्त एकाने दुसऱ्यास ठार मारणे असा मर्यादित नाही. या १० नोव्हेंबर १६५९ साली घडलेल्या नाट्यामागे किमान दहा वर्षांचे नियोजन आहे. स्वराज्य निर्माण व उभारणी या प्रयत्नात विजापूरच्या आदिलशाहीशी टक्कर ही टाळता येणे शक्य नव्हते. कारण आवश्यक तो मुलूख आदिलशाहीच्या ताब्यात होता. इथले निर्णायक महत्त्वाचे किल्लेही आदिलशाहीचे अखत्यारीत होते. ज्यावेळी ही टक्कर होईल तेव्हां कुठल्यातरी टप्प्यावर ती अफजलखानाशी असेल ही जाणीव राजांना फार आधीपासून होती. त्यामुळे पुरंदर, खळद-बेलसर व शिरवळची सुभानमंगळ गढी हे स्थानिक प्रकार म्हणायला हवेत.
यामागे एक तत्त्व उभे आहे. कांहीतरी लहानसा प्रकार घडला आणि राज्याने आपली मोठी शक्ती लगेच पणाला लावली असे कधी घडत नाही. स्वराज्य निर्मितीच्या काळात व आजच्या काळात संपर्क, वाहतूक, संदेशवहन यात जमिनअस्मानाचा फरक आहे. आज जर सातारा भागात दुर्गम ठिकाणी प्रस्थापित सत्तेविरुद्ध कांही प्रकार घडला तर प्रथम स्थानिक पोलीस, मग जिल्हा पोलीस, मग राज्य राखीव दल, पुढे केंद्र राखीव पोलीस आणि सर्वात शेवटी भारताच्या खड्या सैन्याच्या तुकड्या अशा क्रमाने राज्य आपली शक्ती मैदानात उतरवते. त्या जुन्या मध्ययुगीन काळात मुघलांनी प्रथम शाहिस्तेखान, पुढे मिर्झाराजा जयसिंह, आणि शेवटी स्वतः बादशाह औरंगजेब अशा वाढत्या शक्तीने हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढे चालून आपल्याला अफजलखानाविरुद्ध लढाई द्यावी लागणार ही खूणगाठ खूप आधी हेरणे यात थोरल्या राजांची प्रज्ञा दिसते. या लढाईची पूर्वतयारी म्हणून जावळी घेणे, प्रतापगड बांधणे याकडे पाहायला हवे. हा जावळी भाग आदिलशाहीच्या वाई सुभ्याचा भाग होता. अफजलखान तिथला सुभेदार म्हणून वावरलेला होता. तेव्हां आदिलशाही दमदार उत्तराकडे वळेल तेव्हां ते उत्तर ‘अफजलखान’ हेच असणार हे राजांनी हेरले होते. त्यामुळे विजापूर दरबार अंतर्गत कटकटीत गुंतलेला असताना जावळी घेणे, प्रतापगड बांधणे हा दूरवरच्या युद्धनियोजनाचा भाग आहे. ही दूरदृष्टी, हे शांतपणे रचलेले जवळपास दहा वर्षांचे नियोजन ही या घटनेमागची योजक पार्श्वभूमी मनात जागी हवी.
इथे प्रश्न असा पडतो की प्रतापगडाच्या पायथ्याच्या दुर्गम भागात ससैन्य येण्याचा निर्णय अफजलखानने घेतला कसा? सावध, मोहिमा अनुभवलेला हा सेनापती होता. ललित लिखाणात गर्विष्ठपणा, लोभीपणा अशी स्पष्टीकरणे यापूर्वी देण्यात आली आहेत. ते ठीक आहे. खरे कारण निराळे जाणवते.
शिवाजीराजे जावळीच्या अडचणीच्या मुलुखात अफजलखानाला ससैन्य आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. खान मूर्ख नव्हता. मात्र राजे प्रतापगड सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर त्याच्यापुढे दुसरा मार्ग नव्हता. राजांचा बंदोबस्त करण्याची गरज-निकड खानाला होती. शिवाय संभाव्य रणांगणावर आपले सैन्य कुठल्याही नुकसानीशिवाय आणता येणे हा युद्धात प्राथमिक विजय मानला जातो. तरीही खानाने आपले अर्धे सैन्य वाईच्या तळावर म्हणजे मैदानी मुलुखात ठेवले व फक्त अर्धे सैन्य – अंदाजे पाच हजार – घेऊन त्यांनी पाचगणी – महाबळेश्वरचे पठार ओलांडून प्रतापगडाचा पायथा गाठला. जर शिवाजी शरण आला तर ठीकच नाहीतर प्रतापगड हा कांही पन्हाळ्यासारखा प्रचंड किल्ला नाही; सैन्य पूर्ण तयारीनिशी आहे. सबब गड जिंकता येईल हे गणित त्यामागे आहे. हे आता स्पष्ट व्हावे की दोन सेनानायक एकमेकाच्या व्यूहाचा अंदाज घेत पावले टाकत आहेत.
यानंतर राजे व खान यांची भेट, त्याची ठरवाठरवी, बारीकसारीक तपशील यांची चर्चा इथे गरजेची नाही. एकच प्रश्न इथे मांडायचा आहे. या प्रश्नाच्या उत्तरात इतिहासाने व ललित साहित्याने फार काळ उगीचच खर्च केला आहे. याची गरज नव्हती. हा प्रश्न म्हणजे भेटीप्रसंगी प्रथम शस्त्र कुणी चालवले ?
शिवाजी महाराज एक स्वतंत्र राज्य निर्माण करत होते. त्यात अफजलखान ठार होणे हे यासाठी आवश्यक होते की स्वराज्याची शक्ती या लढाईआधी खूप मर्यादित होती. नुसता खान गणितात नव्हता. त्याच्या सैन्यातील शस्त्रे, खजिना, घोडे, तंबू, रसद हे सर्व स्वराज्याच्या पुढील वाटचालीसाठी हवे होते. त्यामुळे सर्व युद्धयोजना आधी ठरली होती. प्रतापगडच्या पायथ्याहून कोकण, वाई वगैरेकडे निसटून जाण्याच्या वाटा स्वराज्याच्या सैनिकांनी खान भेटीआधी ‘सील’ केल्या होत्या. त्यामुळे या फौजेला संपवून सर्व आवश्यक-उपलब्ध साठा ताब्यात घेणे हा पहिला युद्धउद्देश होता. यासाठी प्रथम खान संपवणे आवश्यक होते. त्यामुळे खानाने प्रथम शस्त्र चालवले-दगा दिला; राजांनी स्वतःच्या बचावासाठी खानाला मारले या कथांपासून आपण बाहेर पडायला हवे. ठार मारण्यासाठीच त्याला प्रतापगडाच्या पायथ्याला येणे भाग पाडले होते. यात दग्याचा भाग होताच. फक्त हा दगा शत्रूला होता. मित्राच्या पाठीत वार करणे याला दगा म्हणतात. शक्य असेल तिथे शत्रूला दगा द्यावा लागतो हे शिवाजीराजांच्या आधीच्या काळी आमचे राज्यकर्ते विसरले होते, ते दगा खात असत. हा प्रवाहच राजांनी उलटवला. त्यांच्या ‘युगप्रर्वक’ या सार्थ बिरुदावलीत आता दगा खाणार नाही, गरज पडली तर देऊ या उद्घोषाचा पहिला हुंकार अफजलखानवध आहे. कौटुंबिक बाबी, धार्मिक मठ, राजकारण या क्षेत्रांच्या नीतिनियमांची आपण निष्कारण सरमिसळ केली आणि प्रथम शस्त्र कुणी चालवले यावर काथ्याकूट करत राहिलो.
खान मारल्यावर, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला खानाचा तळ संपवून शस्त्रे-घोडे-खजिना स्वराज्याच्या उपयोगासाठी ताब्यात आल्यावर राजे विजय साजरा करत स्वस्थ बसले नाहीत. अफजलखान वध हा त्या दूरवरच्या योजनेचा फक्त एक टप्पा होता. तातडीने हालचाल करत राजांनी खानाचा वाईचा तळ संपवला, आणखी सामुग्री हाती आली. तसेच पुढे जात त्यांनी पन्हाळा जिंकला म्हणजे वाई ते कोल्हापूर-पन्हाळा या मोठ्या मैदानी पट्ट्यावर स्वराज्याची मोहोर उठवायला सुरुवात झाली. हा विजय नेत्रदीपक आहेच. सोबत यात युद्धनियोजनातला एक छुपा पण कळीचा मुद्दा दडलेला आहे.
प्रतापगड प्रसंगाआधी स्वराज्याची शक्ती मर्यादित होती, ती या विजयानंतर एकाएकी भरतीची लाट आल्यासारखी वाढली कशी ? शस्त्रे, तोफा, तंबू, खजिना मिळाला ह्या सोबत खानाच्या दोन्ही तळावर असलेले युद्धउपयोगी घोडे मोठ्या संख्येने मिळाले. थेट पन्हाळ्यापर्यंत धडक मारायला हे जिंकलेले घोडे मोठ्या कामी आले. इथे तो कळीचा मुद्दा स्पष्ट करायला हवा.
घोडेस्वार, त्यांची खणाखणी यामागे एक वस्तुस्थिती उभी असते. स्वाराच्या हातात लगाम असतो तर पाय रिकिबीत. लगामाच्या वापरातून व रिकिबीतल्या पायांच्या टाचांच्या खुणांनी घोड्याला सूचना दिल्या जातात. डावी-उजवीकडे वळणे, उभे राहाणे, चालणे, दुडकी चाल, भरधाव वेग वगैरे कृतींसाठी स्वार लगाम व टाचांनी खुणा करतो ज्या घोड्याला कळतात कारण त्याला तसे शिकवून तयार केलेले असते. सोबत स्वारालाही या खुणा कशा करायच्या, स्वतःला सावरून घोड्यावर बसणे, एक हाती लगाम वागवत दुसऱ्या हाताने भाला-तलवार वगैरे शस्त्रे चालवणे यात स्वार कुशल असावा लागतो म्हणजे हे सर्व शिकून सराव कायम करावा लागतो. प्रतापगडाच्या युद्धापर्यंत महाराजांचे सैन्य मुख्यतः पायदळ होते. कारण मुलुख डोंगराळ. घोडदळ नव्हते असे नव्हे पण संख्येने कमी. या मर्यादित संख्येतले घोडे वापरून राजांनी अनेक जणांना घोडेस्वारी व त्याआधारे युद्ध यात तयार केले असले पाहिजे. प्रत्येकाकडे स्वतंत्र घोडे नसेल पण एकदा अफजलखान पाडावानंतर त्याची पागा हाती लागताच आधी शिकवून तयार केलेली माणसे तात्काळ घोडेस्वार झाली, त्या युद्धकलेत सहज वावरली. अफजलखान वधामुळे हे सर्व घडले. मात्र हे घडवण्यात फार दूरचा विचार करणारा, त्यावर आधारून नियोजन करणारा, योजना यशस्वीपणे अमलात आणणारा, प्रसंगी स्वतःचा जीव पणाला लावणारा, माणसे पारखून जोडणारा, त्यांना विश्वास देणारा,.... ही गुणमालिका न संपणारी असा शिवाजी केंद्रस्थानी आहे. या अफजलखान प्रसंगामुळे थेट आसाममध्ये राजांची कीर्तीकवने रचली गेली. भारताबाहेर इराणमध्ये पडसाद उमटले.
असे सर्व घडवायला सोबत सहकारीही निरनिराळ्या प्रकारचे लागतात. त्याचा तपशील इथे आवश्यक नाही. मात्र असा सहकारी कारकुनी फडातला असो, व्यवस्थापनातला असो, हेरव्यवस्थेतला असो, कररचना-वसूलीतला असो, खजिन्यातली जोखीम सांभाळणारा असो... त्याच्या दैनंदिन कामातल्या हुशारी शिवाय दोन गुण सर्वांमध्ये असावेच लागतात; निष्ठा व कुठल्याही क्षणी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी.
अफजलखान वधप्रसंग ही मोठी कसोटी होती. विपरीत घडू नये यासाठी राजे एकटे सावध राहून भागणार नव्हते. प्रसंगी स्वत:चा जीव देऊन राजांचे यश सुनिश्चित करणारे अंगरक्षक यांचा सहभाग अती महत्त्वाचा होता. फक्त खानवध पुरेसा नव्हता, तो वध करून राजे सुरक्षित राहणे हे अगत्याचे होते. हे घडणे म्हणजे बडा सय्यद (सय्यद बंडा-मराठी अपभ्रंश) याचा महाराजांवर वार करण्यासाठी उचललेला तलवारीचा हात निमिषार्धात कापून काढत बडा सय्यद संपवणे, हे केले जिऊ महाला याने. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ इतके महत्त्व त्याला व त्याच्या अतीचपळाईच्या कृतीला आहे.
मात्र या माणसाविषयी इतिहासाला फारशी माहिती नाही. खानवधाच्या प्रसंगी मोक्याची कामगिरी पार पडणारा म्हणून शिवचरित्राची निसटती माहिती असणाऱ्यांनाही ‘जिवाजी महाले’ अर्थात ‘जिवा महाला’ हे नाव सहज आठवते. इथून पुढे इतिहास मुका होतो. छत्रपती शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यावर जिवा महाले यांना इनाम गावे दिली. तो दस्त पुस्तकात छापला आहे. मात्र अफजलखान वध ते पुढे जिवा महाले यांचे काय झाले, त्यांनी कुठल्या लढाईत भाग घेतला का, पन्हाळा, शाहिस्तेखान, आग्रा, सुरत, या प्रसंगांवेळी अंगरक्षक म्हणून ते थोरल्या राजांसोबत होते का हे कांहीच माहीत नाही. बालपण, कुमारवय अज्ञात, त्या एका कामगिरीनंतरही सर्व प्रदेश अज्ञाताचा. इतिहास लिहिणे अशक्य.
आमचे स्नेही प्रा. सुरेश गायकवाड यांना या प्रश्नाने भंडावून सोडले. उत्तर त्यांना खुणावत होते, कादंबरी. मात्र कादंबरी लिहायची तर प्रसंग, घटना निर्मिती हवी. घटनाच ज्ञात नाहीत तर पुनर्निर्माण ललित शैलीने म्हटले तरी कसे करणार?
मात्र त्यांनी विचार करणे सोडले नाही. सुदैवाने जिवाजी महाले यांचे गाव साताऱ्याहून म्हणजे प्रा. गायकवाड यांच्या कायम निवासापासून फार दूर नाही. त्यामुळे त्यांना तो परिसर नीट पाहता आला. स्वतः हिंदी भाषेचे प्राध्यापक असल्याने पाश्च्यात्य जगातून एकोणिसाव्या शतकात भारतात आलेल्या ‘कादंबरी’ या साहित्य प्रकाराचा अभ्यास होताच. साधारण साडेतीन-चारशे वर्षांपूर्वीचे म्हणजे वीज-रेडिओ-इंजीन यांचा शोध लागण्यापूर्वीचे खेडे कसे असेल याची कल्पना करायला इतिहास-ललित साहित्य हाताशी होते, त्याचा अभ्यासही होता. तेव्हा हा जिवा घडला कसा, त्याची तालीम, व्यायाम-शस्त्र शिक्षण, त्याचे गुण हेरून जाणत्या माणसांनी त्याला घडवणे, कृष्णाकाठच्या खेड्यातला जीवनक्रम या आधारे प्रसंगनिर्मिती शक्य होती. खेडेगावात श्रद्धास्थानाभोवती वर्षानुवर्षे पाळल्या जाणाऱ्या परंपरा असतात ज्या बदल न करता कसोशीने आचरणात असतात. कांही भटक्या जमाती या खेड्यांच्या गरजा पुरवत हे दृश्य आत्ताआत्तापर्यंत दिसे. या सर्व गोष्टींना उगवतीच्या टप्यावर असलेल्या शिवशाहीची पार्श्वभूमी गुंफवता आली म्हणजे जिवा महाले यांची जडणघडण ते शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक हा प्रवास कल्पनेतून साकार करायला त्यांनी हात घातला ज्यात ते खूप यशस्वी झाले आहेत, हे ही लहानशी कादंबरी वाचताना सहज जाणवते. हे सर्व असेच घडले असा त्यांचाही दावा नाही पण असे घडले असावे असे वाचकाला जाणवते यात त्यांच्या यशाची पावती आहे.
कादंबरी हा प्रकार इंग्रजीपेक्षा रशियन, फ्रेंच या भाषांनी जास्त समर्थपणे हाताळला आहे. भारतावर राज्य इंग्रजांचे आले, भाषा इंग्रजी म्हणून हा साहित्यप्रकार इंग्रजीतून आला. त्या काळांत सर वॉल्टर स्कॉट यांचे नाव ऐतिहासिक कादंबरीच्या क्षेत्रात खूपच आदराने घेतले जाई. पुढे स्कॉट यांच्या कमअस्सल नकलांना सुरवात झाली ज्यात खूप कनिष्ठ दर्जाची नक्कल रेनॉल्डस् यांची. साहजिकच मराठी ऐतिहासिक कादंबरी त्या पद्धतीच्या प्रभावाखाली वाढू लागली.
‘यमुनापर्यटन’ ही बाबा पद्मनजींची ‘कादंबरी’ कथागुच्छ व कादंबरी यांच्या सीमेवरची; बोधवादी; इसाई धर्मप्रचारासाठी वापर हा उद्देश. खऱ्या अर्थाने पहिली मराठी कादंबरी हळबे यांची ‘मुक्तामाला’ मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या कादंबरी प्रवाहात गुंजीकरांची ‘मोचनगड’ ही पहिली. (१८७१) पुढे त्यांचीच ‘मंजूघोषा’ आली. ‘पण लक्ष्यात कोण घेतो’ कर्ते हरीभाऊ ऐतिहासिक कादंबरी क्षेत्रात उतरले व ‘उषःकाल’ पासून सुरवात झाली. ‘शिवशाही’ हा विषय या सर्वांना आकर्षित करणारा ठरला यात नवल नाही. वि. वा. हडप, नाथमाधव यांनीही शिवकालातल्या प्रसंगावरच आपल्या कादंबरी मालिका रचल्या. या सर्वच कादंबऱ्या योगायोग मध्येच गूढतेचे वातावरण आणणाऱ्या, घटनाप्रधान अशा स्वरूपाच्या.
यातून बाहेर पडत ‘व्यक्ती’ वर लक्ष केंद्रित करणारी पहिली मराठी ऐतिहासिक कादंबरी म्हणजे रणजित देसाईंची ‘स्वामी’. या कादंबरीने एक नवा प्रवाह मराठीत सुरु केला. या सगळ्या प्रवासात एका टप्प्यावर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ची आठवण अपरिहार्य आहे. हे चरित्र आहे, कादंबरी नव्हे हे खरेच आहे. मात्र इतिहासातील पुराव्याने सिद्ध होणारे सर्व स्वीकारून भाषावैभव, निसर्गवर्णन अशा रसांनी वाचकांच्या काही पिढ्या या ग्रंथावर लुब्ध आहेत हे यश मोठे.
कादंबऱ्यांच्या वाटचालीत पुरंदरे यांचे पुस्तक हा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. संवाद निसर्गवर्णन हे कादंबरीत असो वा अत्यंत रंजक शैलीने साकारलेल्या शिवचरित्रात, ते काल्पनिकच असते. त्याला इलाज नसतो. मात्र हे संवाद, निसर्गवर्णन, घटना-निर्मिती हे कोंदण असते. इतिहासाने सिद्ध केलेले वास्तव उठावदार करण्यासाठी ही कल्पनाशक्ती आवश्यक असते.
हे सर्व खरे असले तरी खुद्द थोरले छत्रपती, संभाजी राजे, पहिले माधवराव या व अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या आयुष्यात ज्ञात घटना- प्रसंग आहेत; ज्या आधारे चित्र रंगवताना रिकामी जागा भरण्यासाठी कल्पित अशी मर्यादित जागा देता येते. प्रसंगी लेखक एखादी संपूर्ण व्यक्तिरेखा कल्पनेने उभी करतोही. ‘स्वामी’मधली माधवाची ‘रमा’ अशी आहे. इतिहास फक्त रमा-माधव विवाह व रमाबाईंचे सती जाणे एवढेच नोंदवतो. बाकी निर्मिती स्वामीकारांची. मात्र इथे माधवरावांच्या, पेशवाईतल्या ज्ञात घटना आधारासाठी उभ्या होत्या.
‘जिवा महाले’ लिहिताना ही मोठी अडचण पुढे यक्षप्रश्न म्हणून उभी होती. फक्त अफजलवध-बडा सय्यद एवढा फार थोडका काळ व्यापणारा प्रसंग ज्ञात. बाकी सर्वच कल्पनेतून उभे करायचे पण ते वास्तव वाटले पाहिजे. हे आव्हान पेलण्यात सुरेशराव गायकवाड खूपच यशस्वी झाले आहेत. या दृष्टीने पाहता ऐतिहासिक मराठी कादंबरी या प्रकारात त्यांनी एक नवे दार उघडले आहे असे वाटते. हे यश मोठे आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन.
जाता जाता एकदोन मुद्दे सांगायचे म्हणजे कादंबरीत शिवाजी महाराजांच्या उगवत्या राजवटीचा सामान्य प्रजेवर कसा अनुकूल परिणाम होत गेला याचे चित्रण थोडे जास्त झाले असते तर वातावरणाला उठाव आला असता. शेवटी जिवा महालेंसारखी माणसे एका शिवाजीराजांसाठी बलिदानाची सज्जता ठेऊन अज्ञात प्रदेशात उडी का घेतात? ही प्रेरणा कुठून येते याचे थोडे विवरण यात हवे होते.रांझे गावच्या पाटलाचे हातपाय तोडणे याचा उल्लेख आला आहे. हा रंग थोडा आणखी आला असता म्हणजे जिवाचे महाराजांकडे आकर्षित होणे जास्त प्रत्ययकारी झाले असते.
दुसरे म्हणजे कादंबरीत निवेदन-संवाद अशी रचना असते. यात निवेदन आजच्या लेखकाचे तर संवादाची भाषा त्या त्या पात्राची. हे करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. पण तो जास्त कसोशीने व्हायला हवा होता. मधूनच सरमिसळ होते.
वरचे दोन मुद्दे म्हणजे बाळाला तीट लावतात तसे. श्री. गायकवाड यांचा प्रयत्न जिवा महाले या ज्ञात पण अज्ञात व्यक्तीला त्याच्या जडणघडणीसह उभे करण्याचा मुख्यत: आहे. त्यात ते खूपच यशस्वी झाले आहेत.
सातारा: -विश्वास दांडेकर
आश्विन शुद्ध प्रतिपदा १९३६
दि. २५.९.२०१४
उगवतीचे रंग...
प्रतापगड विजयगाथा